जेव्हा मला बोलायचं तेव्हा बोलेन, पंकजा मुंडे

बीड हे महाराष्ट्रातील राजकारणाचे प्रमुख केंद्र आहे. मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार बीडची लोकसंख्या 25 लाख 9 हजार आहे. बीडमध्ये एकूण 10 तालुके आहेत. किल्ले धारूर, अंबेजोगाई, परळी-वैद्यनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर आणि वडवणी हे आहेत. बीडची मुख्य भाषा मराठी आहे. मात्र, येथे हिंदी देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते. बीडला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये अंदाजे दीडशे साखर कारखाने आहेत. त्यासाठी 12 ते 13 लाख ऊसतोड मजूर लागतात. विशेष म्हणजे त्यापैकी आठ लाख मजूर एकटा बीड जिल्ह्यातून जातात. बीड जिल्हातील परळी येथे थर्मल पावर देखील आहे. बीडमध्ये बीड एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी आष्टी विधानसभा मतदारसंघ, केज विधानसभा मतदारसंघ, परळी विधानसभा मतदारसंघ, गेवराई विधानसभा मतदारसंघ आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ आहेत. परळीमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वैजनाथ आहे.

जेव्हा मला बोलायचं तेव्हा बोलेन, पंकजा मुंडे

नाराजी, सूचक इशारे आणि पुन्हा घुमजाव… या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा पक्षात सक्रिय झाल्या आहेत. पंकजा मुंडे सध्या बीडमध्ये असून बीडमध्ये त्यांनी एक व्यापक मोहीम हातात घेतली आहे. या मोहिमेनुसार त्या बीडमधील प्रत्येकाला भेटत आहेत. प्रत्येकाशी संवाद साधत आहेत. भाजी विक्रेता असो की फुल विक्रेता, शेतकरी असो की लाँड्रीवाला प्रत्येकाशी पंकजा मुंडे भेटत आहेत. प्रत्येकाला आपल्या मोहिमेचा उद्देश समजावून सांगत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या या भेटीगाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

पंकजा मुंडे यांनी 3 जून रोजी गोपीनाथ गडावरून मनातील खदखद व्यक्त केली होती. गेल्या 4 वर्षामध्ये अनेक खासदार आणि आमदार झाले आहेत. पण मी पात्र नसेल तर चर्चा होणारच, अशी खदखद पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली होती. त्यावर पंकजा मुंडे यांना परत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिलीय. मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन, असं सूचक विधान पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांनी जोर धरला आहे. पंकजा मुंडे कधी बोलणार आहेत? आणि काय बोलणार आहेत? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच पंकजा यांच्या या नव्या सूचक इशाऱ्याने अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहे.

त्या मोहिमेत सहभागी
पंकजा मुंडे या सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी कालपासून बीडमध्ये ‘संपर्क से समर्थन’ या अभियानात भाग घेतला आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या होम टाऊनमधून काल या अभियानाची सुरुवात केली. या मोहिमेनिमित्ताने त्यांनी परळीतील ग्रामस्थ, छोटे व्यापारी आणि दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी पंकजा मुंडे यांच्या मोहिमेला पाठिंबा देत आपल्या व्यथा आणि समस्याही बोलून दाखवल्या.

काय आहे मोहीम?
संपर्क से समर्थन ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आली आहे. राज्यात 20 ते 30 जूनपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. परळीत पंकजा मुंडे यांनी कालच या मोहिमेला सुरुवात केली. सर्व सामान्य नागरिकांपासून ते भाजी विक्रेता, लाँड्री दुकानदार, फुल विक्रेते यांच्या पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष भेटी घेतल्या. त्यांना मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेली कामगिरी आणि राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारे पॅम्पलेट या दुकानदारांना देण्यात आले. पंकजा मुंडे यांनी स्वतः हे पॅम्पलेट वाटले.

तसे 9090902024 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल करून पंतप्रधान मोदींना समर्थन देण्याचं आवाहन नागरिकांना केलं. पंकजा मुंडे यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामस्थांनी पंकजा यांच्या आवाहनानुसार मिस्ड कॉल देत पंतप्रधानांना समर्थन दिले. यावेळी या मोहिमेत शहर आणि तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow